वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मेडशी, शिरपूर आदी भागांतील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शाहबाबू विद्यालयात दररोज ये-जा करावी लागते. मात्र, जिल्ह्याच्या सीमेमुळे मानव विकास मिशनअंतर्गत चालणाऱ्या बससेवेचा लाभ या विद्यार्थिनींना मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर ते पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची मागणी विधान परिषदेत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील सुमारे 110 विद्यार्थिनी आणि 73 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दररोज पातूर येथे प्रवास करतात. संबंधित परिसरात उर्दू माध्यमातून सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पातूर येथे जावे लागते.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शाहबाबू संस्था, पातूरचे सचिव सैय्यद इस्हाक राही यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अकोला व वाशिम जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी आमदार भावना गवळी यांची भेट घेऊन हा विषय मांडला.
आमदार भावना गवळी यांनी यापूर्वीही या प्रश्नाचा पाठपुरावा केला असून, बुधवार (दि. ८ जुलै) रोजी त्यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित करत शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी केली.
यावर परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
या प्रश्नाला विधान परिषदेत वाचा फुटल्यानंतर उर्दू माध्यमातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया : सैय्यद इस्हाक राही (सचिव, शाहबाबू संस्था, पातूर)
“आमदार श्रीमती भावना गवळी यांनी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित बससेवा सुरू करण्याची मागणी विधान परिषदेत मांडली, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार. ही मागणी लवकर मंजूर होऊन बससेवा सुरू झाल्यास अल्पसंख्याक समाजातील हजारो विद्यार्थिनींना सुरक्षित, सुलभ आणि नियमित शिक्षणासाठी मोठा आधार मिळेल.”
पालकांची भावना
“आमदार भावना गवळी यांनी आमच्या मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न विधान परिषदेत मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. शिरपूर, मालेगाव, मेडशी ते पातूर मानव विकास बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थिनींचा प्रवास सुरक्षित, नियमित आणि सुलभ होईल. त्यामुळे पालकांची चिंता कमी होईल आणि अनेक मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठी मदत मिळेल.”