सिंदखेडराजा | प्रतिनिधी :
“स्वतंत्र विदर्भ राज्य – आत्ताच, नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात व्यापक जनजागर अभियान राबवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला.
समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या १२१ वर्षांपासून सुरू असून, अनेक नेते या चळवळीतून मोठे झाले. मात्र, सत्तेत गेल्यानंतर त्यांनी विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
समितीच्या मते, एकेकाळी “वऱ्हाड” आणि “सोन्याची कुराड” म्हणून ओळखला जाणारा विदर्भ प्रदेश जंगलसंपदा, खनिजसंपत्ती, सुपीक जमीन आणि बारमाही नद्यांनी समृद्ध होता. मात्र महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आत्महत्या, कुपोषण, माता-मृत्यू, बेरोजगारी, नक्षलवाद, प्रदूषण, सिंचन अनुशेष आणि विकासातील विषमता यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचा दावा समितीने केला.
५ ते १२ जुलैदरम्यान जनजागर अभियान
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. निशाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, डॉ. पद्माताई राजपूत, प्रा. मेघा कोटक आणि संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली ५ ते १२ जुलै या कालावधीत पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांत बैठका व पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत यवतमाळ, पुसद, उमरखेड, कारंजा लाड, सिंदखेडराजा, अकोला आणि अमरावती येथे बैठका व पत्रकार परिषदा घेऊन जनजागृती करण्यात आली.
अभियानाच्या प्रारंभी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय रंजनाताई मामर्डे आणि शिक्षक नेते तथा विधान परिषद सदस्य स्वर्गीय प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मेळावा आणि लॉंग मार्चचे नियोजन
बैठकीत २५ जुलै २०२६ रोजी सिंदखेडराजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या **’विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्या’**च्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान काढण्यात येणाऱ्या भव्य लॉंग मार्चच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली.
याशिवाय, प्रीपेड वीज मीटर धोरणाला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणाऱ्या धोरणांविरोधात जनआंदोलन उभारणे तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी अॅड. वामनराव चटप, मुकेश मासुरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. पद्माताई राजपूत, अॅड. सुरेश वानखेडे, बी. बी. चौधरी, वामनराव जाधव, शिवाजी राजे जाधव, डॉ. शिवाजी खरात, प्रा. दिलीप नाईकवाड, प्रवीण गीते, बालाजी सोसे, तेजराव मुंढे, प्रा. रामदास शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे आणि आत्माराम गाडे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले.
