मुंबई | प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोणावळा–कर्जत घाट विभागाला मोठा फटका बसला असून, भूस्खलनामुळे रुळांवर मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा साचल्याने रेल्वे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सुदैवाने, या घटनेत मोठा रेल्वे अपघात टळला.
6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाट विभागातील अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. परिणामी रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात मलबा जमा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अवजड यंत्रसामग्रीसह 1,100 हून अधिक कर्मचारी दुरुस्तीच्या कामात तैनात केले असून, रुळ पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या तांत्रिक कामांमुळे 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत मुंबई–पुणे मार्गावरील अनेक नियमित एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
17 जुलैपर्यंत रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या
- डेक्कन क्वीन
- डेक्कन एक्सप्रेस
- इंटरसिटी एक्सप्रेस
- हैदराबाद एक्सप्रेस
- इंदोर–दौंड एक्सप्रेस
- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
- जोधपूर–हडपसर एक्सप्रेस
- चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
- दादर–शिर्डी एक्सप्रेस
- दादर–सातारा एक्सप्रेस
- दादर–हुबळी एक्सप्रेस
मुंबई–पुणे दरम्यान दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक व स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.

