इंदापूर | प्रतिनिधी
इंदापूर व तळा येथील वनविभागाच्या कारभाराविरोधात स्थानिक नागरिक आणि आदिवासी समाजातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, काही वन कर्मचाऱ्यांकडून मनमानी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वनहक्काच्या जमिनींवरील वादांमुळे वनरक्षक आणि आदिवासी नागरिक यांच्यात वारंवार वाद निर्माण होत आहेत. तसेच वनहक्काच्या जमिनीवर घरकुल उभारण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
याशिवाय, शासनाच्या विद्यमान निर्णयानुसार (जीआर) काही विशिष्ट प्रकारची झाडे तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी परवानगी आवश्यक असते, तर काही झाडे स्वतःच्या मालकीच्या जमिनीत विनापरवाना तोडण्याची मुभा आहे. असे असतानाही स्थानिक शेतकरी व आदिवासींना स्वतःच्या मालकीच्या जमिनीवरील झाडे तोडण्यास अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व प्रकरणांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि शेतकरी व आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
