
भोर | प्रतिनिधी :
भोर–राजगड–मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा संग्राम थोपटे यांनी विसगाव खोऱ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीसह अन्य हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वरुपा थोपटे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीजमिनींचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच पुराच्या तडाख्यात अनेक कष्टकरी कुटुंबांच्या घरांचेही मोठे नुकसान झाल्याची दखल घेत पीडित ग्रामस्थांना धीर दिला.
यावेळी त्यांनी प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच पडझड झालेल्या घरांचे योग्य मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी केली. शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याची ग्वाही स्वरुपा संग्राम थोपटे यांनी यावेळी दिली.
