लोणंद (जि. सातारा) | प्रतिनिधी :

“समाजसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वाचा अंगीकार करत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या **’आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’**च्या वतीने यंदाही लोणंद येथे होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमांतर्गत यावर्षीही वारकरी बंधू-भगिनींना मोफत लाडू वाटप करण्यात येणार आहे. वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा लाडूंची संख्याही वाढविण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वाशी आणि परिसरातील सातारकर बांधव दरवर्षी मोठ्या उत्साहाने या सेवाकार्यात सहभागी होतात. यंदा दोन ते तीन बसेस, चार ते पाच चारचाकी वाहने आणि शेकडो सेवाभावी कार्यकर्ते लोणंद येथे उपस्थित राहून माऊलींच्या सेवेत सहभागी होणार आहेत. हा वाढता सहभाग म्हणजे समाजाने संस्थेवर दाखविलेला विश्वास आणि माऊलींचा आशीर्वाद असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांनाही वारीचा आध्यात्मिक अनुभव
प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक देणगीदार स्वतः उपस्थित राहू शकत नसले तरी आपल्या परिचयातील ज्येष्ठ नागरिकांना वारीचा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी संस्थेसोबत पाठवतात. वारीचे दर्शन, वारकरी परंपरेची ओळख आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव देण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत आहे.
‘सातारकर भवन’ हे महत्त्वाकांक्षी स्वप्न
प्रतिष्ठानचे दीर्घकालीन स्वप्न असलेल्या ‘सातारकर भवन’ प्रकल्पासाठी २०१६ पासून विविध शासकीय कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबईत येणाऱ्या सातारकरांसाठी निवास व्यवस्था, रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरता निवारा तसेच पोलीस, लष्कर व इतर भरतीसाठी येणाऱ्या युवकांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष नानासाहेब निकम आणि उपाध्यक्ष बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत.
वर्षभर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम
प्रतिष्ठान केवळ धार्मिक उपक्रमांपुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. दसरा मेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘सातारा रत्न’, ‘सातारा भूषण’ आणि ‘सातारा विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.
तसेच कोविडनंतर अडचणीत आलेल्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकर उद्योजक संघ स्थापन करण्यात आला आहे. महिला बचत गट, नवउद्योजक आणि लघुउद्योजकांसाठी मार्गदर्शन, विपणन सुविधा, स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तक योजना, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, विवाह मंडळ, रोजगार मार्गदर्शन, रक्तदान, अवयवदान आणि आपत्कालीन आरोग्य सेवा असे अनेक उपक्रमही प्रतिष्ठान राबवत आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “जे जे वांछील ते ते लाहो” या पसायदानातील संदेशातून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे. सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा हा सेवायज्ञ भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
