अलिबाग | प्रतिनिधी :
अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे आणि दिघोडी या गावांतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असूनही अद्याप सकारात्मक निर्णय झालेला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी या मार्गावरून अलिबाग, मुंबई, पेण आणि ठाणे या ठिकाणांसाठी दिवसातून सुमारे आठ एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र, आवास येथे रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम सुरू असले तरी परिसरात तीन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. असे असूनही पर्यायी मार्गाने एसटी सेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बससेवा बंद असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भारही वाढला आहे.
या संदर्भात आवास, सासवणे आणि दिघोडी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देऊन बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे काही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही उपलब्ध पर्यायी मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गावरून एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.







