धुळे | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक तसेच महापालिका शाळांतील शिक्षकांनी सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदवला.
शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्ती रद्द करावी.
- १५ मार्च २०२४ चा संचमान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून त्यात सुधारणा करावी आणि शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत.
- बीएलओ (BLO) चे काम शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपवावे, जेणेकरून शिक्षकांना अध्यापनावर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करता येईल.
- १४ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेले टीईटी व सीटीईटी संदर्भातील पत्र मागे घ्यावे.
- टीईटी प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून २०१३ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद करावी.
आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. शिक्षकांना अध्यापनाबाहेरील कामांमधून मुक्त करून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देता यावा, हीच आंदोलनामागील प्रमुख भूमिका असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

