नेर | वार्ताहर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाच्या वतीने आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नेर शाखेचे व्यवस्थापक श्री. अनिकेत चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेल्या वसंतराव नाईक यांनी सिंचनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी ग्रामविकासाचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी प्रभावी नियोजन केले. त्यांच्या लोककल्याणकारी नेतृत्वामुळे महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळाली.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय मांजरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. अडसोड आणि समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. डी. वडते उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय मांजरे यांनी सांगितले की, “स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील योगदान अतुलनीय असून त्यांचे कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शीतल जाधव व डॉ. संदीप काटोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

