
मोताळा | प्रतिनिधी :
मोताळा तालुक्यातील किन्होळा येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा वाद तहसीलदार सरिता पाटील (खटाळ) यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकारातून यशस्वीरीत्या निकाली निघाला. महसूल प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे संबंधित शेतकऱ्यांना शेताचा रस्ता उपलब्ध झाल्याने यंदाच्या हंगामातील पेरणी वेळेत करता आली.
शेतशिवारातील रस्त्यांबाबतचे वाद न्यायालयीन प्रक्रियेत न नेता आपसातील समन्वय, प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकसहभागातून सोडविल्यास वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो, याचे हे आदर्श उदाहरण ठरले आहे.
किन्होळा येथील शेतकरी प्रकाश इंगोले आणि वसंत इंगोले यांच्यात शेतरस्त्याच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार सरिता पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. दोन्ही पक्षांशी चर्चा करत सामोपचाराने तोडगा काढण्याचे महत्त्व पटवून दिले.
दोन्ही शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर गावातील पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हा वाद अखेर सामंजस्याने सोडविण्यात महसूल प्रशासनाला यश आले.
यावेळी माजी सभापती कैलास गवई, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद किन्होळकर, पोलीस पाटील प्रदीप वैराळकर, मंडळ अधिकारी धनंजय शेवाळे, ग्राम महसूल अधिकारी मंदा राठोड तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शेतरस्ता उपलब्ध झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला यंदाची पेरणी वेळेत करता आली असून, अनेक वर्षांचे आपसी मतभेदही दूर झाले. तहसीलदार सरिता पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि संवेदनशील प्रशासनाचे शेतकरी व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
