सिंदखेडराजा | प्रतिनिधी :
“स्वतंत्र विदर्भ राज्य – आत्ताच, नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात व्यापक जनजागृती अभियान राबविले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा समितीने केला असून, स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या १२१ वर्षांपासून सुरू आहे. अनेक नेते या आंदोलनातून पुढे आले; मात्र सत्तेत गेल्यानंतर त्यांनी विदर्भाच्या प्रश्नाशी बेईमानी केल्याचा आरोप त्यांनी केला.
समितीच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी “वऱ्हाड” आणि “सोन्याची कुराड” म्हणून ओळखला जाणारा विदर्भ प्रदेश जंगलसंपदा, खनिजसंपत्ती, बारमाही नद्या आणि सुपीक जमिनीमुळे समृद्ध होता. मात्र, महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, सिंचन अनुशेष, प्रदूषण आणि विकासातील विषमता यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
या अभियानाचे नेतृत्व अॅड. वामनराव चटप, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. निशाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, डॉ. पद्माताई राजपूत, प्रा. मेघा कोटक आणि संभाजी शिर्के यांनी केले.
५ ते १२ जुलै या कालावधीत यवतमाळ, पुसद, उमरखेड, कारंजा लाड, सिंदखेडराजा, अकोला आणि अमरावती येथे जिल्हास्तरीय बैठका व पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले.
अभियानाच्या प्रारंभी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्व. रंजनाताई मामर्डे तसेच शिक्षक नेते व विधान परिषद सदस्य स्व. प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी २५ जुलै २०२६ रोजी सिंदखेडराजा येथे आयोजित ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ तसेच ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान काढण्यात येणाऱ्या भव्य लॉंग मार्चच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
तसेच प्रीपेड वीज मीटर धोरणाला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी जनआंदोलन उभारणे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी अॅड. वामनराव चटप, मुकेश मासुरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. पद्माताई राजपूत, अॅड. सुरेश वानखेडे, बी. बी. चौधरी, वामनराव जाधव, शिवाजीराजे जाधव, डॉ. शिवाजी खरात, प्रा. दिलीप नाईकवाड, प्रवीण गीते, बालाजी सोसे, तेजराव मुंढे, प्रा. रामदास शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे आणि आत्माराम गाडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
