
चास (ता. अकोले) | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चास गावातून पंढरपूरकडे निघालेल्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. टाळ-मृदुंग, पखवाज, वीणेचा निनाद आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल-विठ्ठल”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले.
दिंडीत महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन श्रद्धापूर्वक सहभाग नोंदवला, तर पुरुष वारकरी पारंपरिक पांढऱ्या वेशात टाळ, पखवाज आणि वीणा वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
गावभर भगव्या पताका, अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजराने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले.
पायी पंढरपूर गाठून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याचा संकल्प यावेळी वारकऱ्यांनी केला. दिंडीच्या प्रस्थानावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला.
