दोडामार्ग | प्रतिनिधी
“राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल…” या अखंड नामघोषात दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब आणि सौ. वेदिकाताई परब यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे दर्शन घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा अमूल्य वारसा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी दिलेला समता, सेवा, भक्ती व मानवतेचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. ही संत परंपरा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून दोडामार्गचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.”

वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास नसून श्रद्धा, शिस्त, सेवा, समता आणि बंधुभावाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, मुखी हरिनाम आणि हृदयात विठ्ठलभक्ती घेऊन पायी पंढरपूरची वारी करतात. समाजात प्रेम, सद्भावना आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे.
‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात वारकऱ्यांनी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

