अंबरनाथ | प्रतिनिधी
अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक १ब आणि २अ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुसळधार पाऊस सुरू असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक १ब मध्ये तब्बल पाच-पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही केवळ सुमारे एक तासच होत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. प्रभाग क्रमांक २अ मध्येही पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
“भरपूर पाऊस पडत असताना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा का निर्माण होत आहे? शहरातील पाणी नेमके कुठे जात आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थापनात त्रुटी आहेत की कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, अशीही शंका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः वणवण सुरू असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणींचे कारण स्पष्ट करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

