
परतूर | प्रतिनिधी
परतूर पंचायत समिती कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, परिसरात सार्वजनिक शौचालय व लघुशंकेची पुरेशी व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र लहाणू भदर्गे, महादेव भगवान पैठणे, माजी आष्टी सर्कल उपाध्यक्ष आकाश प्रकाश साळवे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जालना जिल्हा सदस्य आकाश अंबादास वाघमारे यांच्यासह आकाश बांगर, विकास साठे, सचिन काऊतकर, अनिल मगर (पत्रकार), प्रमोद शिरसाट, रुद्र घोडे आणि अभिजित सुतार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात पंचायत समिती परिसरात तातडीने सार्वजनिक शौचालय व लघुशंकेची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच १५ दिवसांच्या आत आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदन स्वीकारताना नवनियुक्त गटविकास अधिकारी कौशल पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, गटविकास अधिकारी कौशल पाटील यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.
यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

