कडेगाव | प्रतिनिधी
राज्यातील शिक्षण विभागामार्फत कार्यरत असलेले सुमारे ७१६ आधार नोंदणी व अद्ययावत (अपडेट) संच कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच आधार ऑपरेटर मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आधार बायोमेट्रिक अद्ययावत प्रक्रिया, शाळांतील विविध प्रशासकीय कामे तसेच शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या आधारसंबंधित सेवांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आधार अद्ययावत करण्याची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांनाही संच बंद करण्यामागील नेमके कारण स्पष्टपणे सांगता आले नसल्याची माहिती मिळत आहे.
आधार ऑपरेटरांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता सेवा बंद करण्यात आल्याने त्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ऑपरेटरांनी आवश्यक असलेली सिक्युरिटी डिपॉझिट (Security Deposit) भरल्यानंतरही अचानक सेवा बंद झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आधार ऑपरेटर यांनी शिक्षण आयुक्तालय, शालेय शिक्षण विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन बंद करण्यात आलेले आधार नोंदणी व अद्ययावत संच पुन्हा सुरू करावेत तसेच प्रलंबित कामांसाठी त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
