कारंजा लाड | प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शेतकरी विकास समितीच्या वतीने कारंजा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी विकास समितीचे अध्यक्ष राजू ताडे यांनी आंदोलनादरम्यान बोलताना, “दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य असून आम्ही त्याला जाहीर समर्थन देत आहोत. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,” असे सांगितले.
यावेळी कारंजा तहसीलचे तहसीलदार रवी महाले यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिक पदांवरील व्यक्तींनी नैतिक जबाबदारीचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शविला असून विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
