
अकोला | प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत सन २०१९ च्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन २०१९ च्या कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनाही अधिक दिलासा देण्याची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनादरम्यानही आमदार सावरकर यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत या मागणीचा पाठपुरावा केला होता.
शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत असतानाच, २०१९ च्या योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांनाही समान दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात ही घोषणा केली.
या निर्णयाचे स्वागत करत आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकारचे आभार मानले. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.





