
भडगाव | वार्ताहर
भडगाव तालुक्यातील वलवाडी गावचे सुपुत्र तथा सीमा सुरक्षा दल (BSF) मधील जवान राजेंद्र रामचंद्र पाटील यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. १० जुलै) वलवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला.
राजेंद्र पाटील यांनी सन २०१२ मध्ये सीमा सुरक्षा दलात प्रवेश करून देशसेवेची वाट निवडली होती. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या त्यांची नियुक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथे होती.
कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्रथम त्यांना मूळ गावी आणून उपचार करण्यात आले. त्यानंतर धुळे येथील रुग्णालयात आणि पुढे सुरत येथील विशेष रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहीण आणि अडीच वर्षांचा मुलगा तनुष पाटील असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी चिमुकल्या तनुषने वडिलांना अग्निडाग दिला. हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण वलवाडी गावात शोकमय वातावरण होते. गावातील चौकाचौकात श्रद्धांजलीपर डिजिटल फलक लावण्यात आले होते. “भारत माता की जय”, “राजेंद्र पाटील अमर रहें” आणि “जय जवान”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अंत्यसंस्कारावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोकसलामी अर्पण केली. तसेच भडगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रमेश देवकर, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
राजेंद्र पाटील यांच्या निधनाने भडगाव तालुक्याने एक कर्तव्यनिष्ठ, देशभक्त आणि शूर जवान गमावला आहे. त्यांच्या शौर्याची, सेवाभावाची आणि देशनिष्ठेची प्रेरणा कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.






