सिल्लोड | प्रतिनिधी
सिल्लोड शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पूर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
बैठकीत खासदारांनी शहरात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पूर्णा नदीचे पाणी प्रदूषित होत असून, भवन, बोरगाव, चिंचखेडा आणि तांडा बाजार परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देता येणार नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी खासदार डॉ. काळे यांनी केली. तसेच, योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान उपविभागीय अधिकारी फुलारी, तहसीलदार अंकिता ताकभाते आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, तालुकाध्यक्ष निलेश काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश कळम, ॲड. लिंगायत, माजी शहराध्यक्ष शेख फिरोज, शहराध्यक्ष आवेश आझाद दांडगे, फिरोज मेवाती यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, नागरिकांनी शहरातील सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया करूनच ते नदीत सोडावे, अशी मागणी केली असून, प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






