बुलढाणा | प्रतिनिधी :
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना मिळणाऱ्या टोलमाफीचा कालावधी यंदा वाढविण्यात आला असून, याबाबत वारकरी धर्म परिषदेने आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे. यापूर्वी ८ ते १० दिवसांपुरती मर्यादित असलेली टोलमाफी यंदा २३ दिवसांसाठी लागू करण्यात आल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
वारकरी धर्म परिषदेच्या म्हणण्यानुसार, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (मूळ प्रसिद्धीपत्रकात सुनेत्रा पवार असा उल्लेख आहे), तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातत्याने निवेदने, पत्रव्यवहार, बैठका आणि आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला.
या लढ्यात वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री, राष्ट्रीय महासचिव हभप ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
परिषदेच्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशानुसार ६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत वारकऱ्यांच्या पात्र वाहनांना टोलमाफीचा लाभ उपलब्ध राहणार आहे. यासाठी संबंधित वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह स्थानिक पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री यांनी महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.






