रायगड प्रतिनिधी :
अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या रस्त्यांवरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सासवणे ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.





