अहेरी | प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) अहेरी शाखेतर्फे तालुक्यातील गुणवंत व विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. धर्मराव विज्ञान महाविद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य तथा विद्यार्थी विकास परिषद केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रा. धर्मेंद्र भाऊ मुनघाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. चालुरकर उपस्थित होते. तसेच तालुकाध्यक्ष प्रा. मंचालवार आणि नगरमंत्री रापर्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आत्मा म्हणजे विद्यार्थी असून विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि त्यांचा हक्कासाठी संघर्ष करणे हेच आमचे जीवन व दायित्व आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी ९ जुलै १९४९ रोजी स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेचा इतिहास, विविध आंदोलने, कार्यपद्धती आणि विद्यार्थी संघटनांची गरज याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि मिस्कील शैलीतील भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्राचार्य डॉ. चालुरकर यांनी “आजचा विद्यार्थी आणि भविष्यातील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करत यशस्वी जीवनासाठी आवश्यक तंत्र आणि मंत्र विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यावेळी तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सन २०२६ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहेरी तालुका शाखेने केले.



