
मानवत | प्रतिनिधी :
मानवत शहरातील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी पोलिस निरीक्षक, मानवत पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता जुने बसस्थानक परिसरातील सोमाणी हॉस्पिटलजवळ अभयसिंह मधुकरराव दहे यांना मोटारसायकलवर कट मारून अडविण्यात आले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते ॲड. विक्रमसिंह मधुकरराव दहे यांच्यासह दोघांवर कथितपणे प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात शहरात काही व्यक्तींकडून भरधाव वाहन चालविणे, नागरिकांना धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणे, विनापरवाना दारू विक्री, अवैध सावकारी, नागरिकांची वाहने बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे तसेच इतर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून घटनेचा सखोल तपास करावा तसेच यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील मागण्यांचाही विचार करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, गोपनीय शाखेचे अनिस कौसडीकर, विलास मोरे, सय्यद फय्यास, अतुल पंचांगे, शेख मुखिद, सुनीलसिंग बावरी, दीपक भेंडे तसेच वाहनचालक अविनाश डंबाळे यांच्यासह पोलीस पथकाने शहरात विशेष गस्त घालत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग केले.
या घटनेच्या निषेधार्थ मानवत शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या निवेदनावर शहरातील अनेक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला.

