कन्नड | प्रतिनिधी
जळगाव घाट येथील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीने उभारलेल्या शैक्षणिक लढ्याला अखेर यश आले असून जिल्हा परिषद शाळा, जळगाव घाट येथे इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांना आता आपल्या गावातच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज सुमारे ८ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. खराब रस्ते, पावसाळ्यातील अडचणी तसेच उन्हा-पावसाचा सामना करत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत होते. या सर्व अडचणींनंतरही जळगाव घाट येथील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
इयत्ता ९ वीचा वर्ग गावातच सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचणार असून शिक्षण अधिक सुलभ होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.
या यशामागे गावकऱ्यांची एकजूट, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे योगदान आणि लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या शिस्तबद्ध आंदोलनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. या ऐतिहासिक यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे शालेय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष नितीन बारगळ पाटील यांच्यासह सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
