माढा | प्रतिनिधी
माढा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ मधील कुर्डूवाडी-बार्शी रस्ता ते माळी गल्ली या रस्त्याच्या बांधकामादरम्यान परिसरातील शासकीय हातपंप आणि बोरवेल बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत शहाजी (अभिजीत) संजय साठे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित रस्त्याच्या कामादरम्यान परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेले शासकीय हातपंप व बोरवेल बुजवण्यात आले. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत सुविधांची नासधूस करणे अत्यंत गंभीर बाब असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माढा नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहाजी (अभिजीत) संजय साठे यांनी दिला आहे.
