निलंगा (लातूर) | प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी निलंगा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागात पेरण्या अर्धवट राहिल्या असून अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदा आतापर्यंत तालुक्यात केवळ ३० ते ४० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून तीही पावसाअभावी अडचणीत आली आहे. उगवलेल्या पिकांवर करपण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी कुरणे ओस पडली असून चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यातच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
सध्या निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून पुढील दहा दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक चक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाने या अस्मानी संकटाची तातडीने दखल घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांसाठी आवश्यक मदत, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता तसेच अन्य दिलासादायक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.










