मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यात जून महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात शंभर टक्के खरीप पेरणी पूर्ण केली. जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवणही चांगली झाली. काही ठिकाणी पिके तीन इंच, तर काही ठिकाणी सहा इंचांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने परिस्थिती बदलली आहे. कडक उन्हामुळे उगवलेली पिके करपू लागली असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा असला, तरी पावसावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, “ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांना पिके वाचवता येतील; मात्र केवळ पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.”
सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून लवकरच दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









