तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. परिसरात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, ९ जुलैनंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परिसरात जवळपास शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, कडक ऊन आणि वाढत्या उष्णतेमुळे पावसाअभावी पिकांवर ताण निर्माण होत असून शेतकरी आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही निर्माण होऊ शकते.
दरम्यान, पावसाअभावी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पशुपालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या पिवंदळ बु. परिसरातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले असून लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.









