पातूर | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपूर्ण लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली.
या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे, प्रचारासाठी स्वतंत्र वेळ तसेच मतदान प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देश, राज्य, जिल्हा आणि गावपातळीवरील लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
शाळेच्या प्रशासनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक तसेच महिला व बालकल्याण अशा विविध खात्यांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडून आलेले विद्यार्थी संबंधित खात्यांचे मंत्री म्हणून वर्षभर कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या समस्या, सूचना आणि गरजा शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहेत.
यावर्षी प्रथमच महिला व बालकल्याण खाते स्थापन करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आणि आवश्यक बाबी प्रभावीपणे हाताळण्यास मदत होणार आहे.
या निवडणुकीत विजयी झालेले विद्यार्थी विविध खात्यांचे मंत्री म्हणून कार्यरत राहतील. त्यांच्यामधूनच लोकशाही पद्धतीने शालेय मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन ढोणे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जे. डी. कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








