
पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे.
पावसाअभावी शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी कालव्यामध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी शासनाकडे केली आहे. पिके वाचविण्यासाठी त्वरित निर्णय घेऊन कालव्यातून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यावर अद्यापही दुष्काळाचे सावट कायम असल्याने कृषी क्षेत्रासमोरील संकट अधिक गडद होत आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






