दुघाळा | प्रतिनिधी :
औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा शिवारात वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. पेरणीनंतर उगवलेली सोयाबीनसह इतर खरीप पिके तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे करपू लागली असून अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असमाधान आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर दीर्घकाळ पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी पिके सुकू लागली असून उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. बियाणे, खते, मशागत आणि इतर शेतीकामांवर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने आर्थिक अडचणी अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक मदत जाहीर करावी, तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या दुघाळा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, वेळेत चांगला पाऊस होऊन खरीप हंगाम वाचावा, अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.







