
माढा | प्रतिनिधी
माढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर जुलै महिन्यातही पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे.
पावसाअभावी सोयाबीन, तूर, मका आणि इतर खरीप पिके पाण्याअभावी करपू लागली असून अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू करून तसेच सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास उभी पिके वाचण्यास मोठी मदत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सोलापूर जिल्ह्यावर अद्यापही दुष्काळाचे सावट कायम असून कृषी क्षेत्रासमोरील संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.






