कारंजा | प्रतिनिधी
कारंजा तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वेळेवर पाऊस न झाल्याने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नाही, तर उगवलेली पिकेही पाण्याअभावी सुकू लागली आहेत.
शेतकऱ्यांसमोर आता जनावरांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांचे नुकसान, वाढते उत्पादन खर्च आणि पावसाच्या लांबलेल्या प्रतीक्षेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील परिस्थितीची शासन आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पंचनामे करावेत, नुकसानीचा अहवाल सादर करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच लोकप्रतिनिधींनीही या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा आणि कृषी मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


