
वाळवा | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथून श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सुमारे अडीच ते तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.
पालखीचे पहिले रिंगण गडपटा येथे होणार असून त्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम ताकारी येथे असेल. किल्ले मच्छिंद्रगड ते ताकारी या मार्गावरील लवणाची, येडे मच्छिंद्र, भवानीनगर, रेटरे, हरणाक्ष, दुधारी आदी गावांतील भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत करतात. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी, रांगोळ्या आणि आरतीने श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे स्वागत केले जाते. माता-भगिनी औक्षण करून पालखीचे दर्शन घेतात.
ताकारी येथील मुक्कामानंतर पालखी तुपारी, दह्यारी, घोगाव, कुंडल मार्गे अळसंद येथे मुक्कामी पोहोचते. अशा प्रकारे मजल-दरमजल करत हा पालखी सोहळा शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी वाखरी येथे सर्व संतांच्या पालख्यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहे. वाखरी येथे कीर्तन झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. पंढरपूर येथील मठात दुपारी सुमारे ५ वाजता पालखीचा विसावा होणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा पालखी सोहळा भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा असून दरवर्षी पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातील भाविक मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात.







