पिंपोडे | प्रतिनिधी :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, बंद असलेल्या वाठार–सोळशी आणि वाठार–भावेनगर या एसटी बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
या बससेवा सुरू झाल्यामुळे सोनके, जगतापनगर, नायगाव, नांदवळ, भावेनगर आदी गावांतील विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
यापूर्वी वाठार–सोळशी बस दुपारी साडेचार वाजता आणि सायंकाळी सात वाजता धावत होती. शाळा सायंकाळी पाच वाजता सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सात वाजेपर्यंत पिंपोडे बसस्थानकात थांबावे लागत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येबाबत विद्यार्थी आणि पालकांनी राहुल वाघांबरे यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत राहुल वाघांबरे यांनी कोरेगाव आगारप्रमुखांकडे निवेदन सादर करून बससेवा नियमित व वेळेवर सुरू करण्याची मागणी केली. आगारप्रमुखांनीही या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
बससेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, जनहिताच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल राहुल वाघांबरे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.





