
शहादा | प्रतिनिधी
शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावरून ऑल इंडिया पँथर सेनेने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी या घटनेची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दीपकभाई केदार यांनी शहादा येथील रुग्णालय व वसतिगृहाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेत उपचारासाठी हलविण्यात झालेल्या विलंबाबाबत, वसतिगृहातील सुविधांची स्थिती तसेच भोजन व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. या प्रकरणात संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विषबाधेच्या घटनेमागील कारणांचा निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असला, तरी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची गरज असल्याचे पँथर सेनेने म्हटले आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांमधील भोजन व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.
पँथर सेनेने इशारा दिला आहे की, या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नंदुरबार येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.




