
शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मोहीदे त.श. येथील समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधेच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेला तीन दिवस उलटूनही विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
शनिवारी रात्री विद्यार्थ्यांनी शेवग्याची भाजी, भात आणि चपातीचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, उर्वरित १० विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
समाज कल्याण विभागाचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने शाळेच्या स्वयंपाकगृहातून शिजवलेल्या अन्नाचे तसेच कच्च्या साहित्याचे नमुने जप्त केले असून, विद्यार्थ्यांच्या रक्त व उलट्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घटनेनंतर शाळा, वसतिगृह आणि रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणामुळे निवासी शाळेतील प्रशासकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेत १५७ विद्यार्थी शिक्षण घेत असताना सात शिक्षकांची मंजूर पदे असूनही प्रत्यक्षात केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच प्रभारी अधिकाऱ्यांवरच शाळा आणि वसतिगृहाची जबाबदारी असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर सुमारे ३० विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडून घरी जाणे पसंत केले असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.




