ठाकर आडगाव | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील बालवाडीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बालवाडीच्या दुरुस्तीकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बालवाडीच्या चहूबाजूंच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून छताचे प्लास्टरही निखळून खाली पडत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच इमारतीत घुशी व उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
याशिवाय, लहान मुलांच्या खाऊसाठी सुरक्षित साठवण व्यवस्था नसल्याची तसेच मुलांना बसण्यासाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, या समस्येबाबत स्थानिक सरपंचांकडे सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन अंगणवाडीसाठी जागा निश्चित होऊनही सहा महिने उलटले तरी बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
“जर एखाद्या लहान मुलाच्या अंगावर छताचे प्लास्टर किंवा भिंत कोसळली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच बालवाडीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन इमारतीचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



