
दोंडाईचा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सरकार साहेब रावल यांनी प्रत्येक नागरिकाने भविष्यातील पर्यावरणीय संकट लक्षात घेऊन किमान पाच वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवीण महाजन यांनी सांगितले की, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड केली जाते. तसेच सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त मालपूर रोडवरील वनविभागाच्या जागेत भव्य ऑक्सिजन पार्क उभारण्यात येत असून, नागरिकांनी तेथे जाऊन वृक्षारोपणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी दोंडाईचा आगारात लवकरच नवीन जिजाऊ आणि वातानुकूलित शिवाई बसेसचा समावेश करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी दोंडाईचा बस आगार परिसरात दरवर्षी सातत्याने वृक्षारोपण करून दाट हरित पट्टा विकसित करण्यात आल्याचे सांगितले. यंदाही उपलब्ध जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक सुनील भाबड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







