खटाव | तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या औंध ते खबालवाडी रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. सुमारे ७ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या या विकासकामाचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
हा भूमिपूजन सोहळा १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता खबालवाडी येथे पार पडला. यावेळी युवा उद्योजक अंकुश गोरे, औंध व खबालवाडी परिसरातील ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे औंध–खबालवाडी मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून, स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. पावसाळ्यात होणारी गैरसोय कमी होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सदर विकासकामाची अंमलबजावणी युनिटी बिल्डर्स अँड रोड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही.) आणि भारती इन्फ्रा, सातारा यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. भूमिपूजनानंतर लवकरात लवकर दर्जेदार काम पूर्ण करून रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



