
देवळी | वर्धा | प्रतिनिधी :
देवळी तालुक्यातील तांभा गावातील मुख्य रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोका वाढल्याने ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पुंजारामजी मडावी यांनी ग्रामसेवक तथा प्रशासक, ग्रामपंचायत तांभा यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात गावातील मुख्य रस्त्यावर, विशेषतः एसटी बस वळण घेत असलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच रस्त्याच्या कडेला गाई-बैल कायमस्वरूपी बसत असल्याने एसटी बस, इतर वाहने तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित ठिकाणाची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, तसेच रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करून वाहतुकीतील अडथळे कायमस्वरूपी दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.




