
मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना आवाहन
करमाळा | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मॅपिंग अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले की, मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक नागरिकाने २९ जुलैपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे त्यांनी आवाहन केले.
त्या म्हणाल्या की, आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
तहसीलदार ठोकडे यांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही गावागावांत जनजागृती करण्याचे आवाहन केले. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी पक्षांच्या संघटनात्मक यंत्रणेने सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले. बीएलओ-२ यांच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येणार असून, या कामात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष तथा मकाईचे संचालक सचिन बापू पिसाळ, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी दीदी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर, मकाईचे संचालक सतीश बापू नीळ, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, अशोक नरसाळे, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, पत्रकार सुनील भोसले, प्रफुल्ल दामोदरे, रितेश कटारिया, संजय चौगुले, प्रशांत भोसले, सिद्धार्थ वाघमारे, दिनेश मुथ्था, सचिन चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी पुन्हा एकदा आवाहन करताना सांगितले, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने २९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा.”



