
प्रतिनिधी |
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रेवणनाथ गायकवाड यांनी केली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी व सुधारणा करण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती संकलन, पूर्वी भरलेल्या अर्जांची आणि मतदार माहितीची पडताळणी केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार तसेच अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे हा आहे.
या मोहिमेसाठी शिक्षक, आरोग्यसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रेवणनाथ गायकवाड म्हणाले की, एसआयआरमुळे बोगस मतदानाला आळा बसण्यास मदत होणार ही चांगली बाब असली, तरी शिक्षकांना या कामात गुंतवल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा अधिक प्रभावी सहभाग घेऊन शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा. शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हेच असून त्यांचे स्थान वर्गात असावे, BLO च्या कामात नव्हे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ वाचेल, अशा पद्धतीने एसआयआर मोहिमेची अंमलबजावणी करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ ठरेल, असेही रेवणनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.
