
प्रतिनिधी |
आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम”चा गजर करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले असताना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला. या सेवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मंगेश साळवे यांनी कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून दिला.
पालखी मार्गावर उन्हाचा तडाखा, मोठी गर्दी आणि अनेक तासांची सलग ड्युटी असूनही मंगेश साळवे यांनी वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. प्रत्येक वारकरी सुखरूपपणे पुढील प्रवास करू शकेल, यासाठी त्यांनी सातत्याने दक्षता घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले.
वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी चालत होते, तर त्यांच्या सेवेलाच आपला विठ्ठल मानून साळवे यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या शांत, संयमी आणि जबाबदार कार्यपद्धतीमुळे पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यास मदत झाल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
“कर्तव्य हीच पूजा, जनसेवा हाच धर्म” या भावनेने कार्य करणाऱ्या अशा कर्तव्यनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे वारीसारखा भव्य धार्मिक सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतो. API मंगेश साळवे यांच्या सेवाभावाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कार्याला नागरिकांनी सलाम केला आहे.
