
लातूर | प्रतिनिधी
ईपीएस-95 संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार शिवाजीराव काळगे यांची लातूर येथील कार्यालयात भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार काळगे यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात ईपीएस-95 पेन्शनधारकांचा प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
बैठकीत ईपीएस-95 संघर्ष समितीचे मराठवाडा सहसचिव सूर्यकांत नादरगे यांनी प्रस्तावना करत पेन्शनधारकांच्या विविध मागण्या सविस्तर मांडल्या. त्यावर खासदार शिवाजीराव काळगे म्हणाले की, हा विषय यापूर्वीही त्यांनी तीन ते चार वेळा संसदेत उपस्थित केला असून केंद्रीय कामगार मंत्र्यांकडेही तो निकाली काढण्याची मागणी केली आहे. आगामी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा ठामपणे मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनालाही उपस्थित राहून संसदेत पेन्शनधारकांचा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “तुमच्या मागण्या रास्त आहेत. सरकारवर दबाव निर्माण करून कोणत्याही पेन्शनधारकावर आत्मदहनाची वेळ येऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित पेन्शनधारकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या बैठकीला १६० हून अधिक पेन्शनधारक उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा सहसचिव सूर्यकांत नादरगे, लातूर जिल्हाध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे व विजय काळे, जिल्हा सहसचिव भास्कर आदमने पाटील, उदगीरचे पी. के. देशमुख यांच्यासह विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सूर्यकांत नादरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात सर्व पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि घरी बसलेल्या पेन्शनधारकांनीही आपल्या हक्कासाठीच्या या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
