
शिरोळ | प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील गिरकचाळ परिसरात मांजरा नदीवर उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून, हा पूल पूर्ण झाल्यानंतर लातूर, बाबळगाव, निटूर, शिरोळ, वांजरवाडा, हेळंब, वलांडी, देवणी आणि उदगीर या मार्गावरील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या या मार्गावर मांजरा धरणाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून वाहतूक केली जाते. मात्र हा पूल अत्यंत अरुंद असल्याने एकाच वेळी दोन्ही बाजूंनी मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या बाजूच्या वाहनांना बराच वेळ थांबावे लागते. परिणामी वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा वेळ वाया जाण्याची समस्या निर्माण होत आहे.
नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि जलद होणार आहे. तसेच हा मार्ग लातूर आणि उदगीर परिसराला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने वाहनधारकांचा प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी पुलाचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली असून, हा पूल सुरू झाल्यानंतर परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होऊन विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
