भिलवडी | प्रतिनिधी
कृष्णा नदीवरील तुंग–सुखवाडी पुलामुळे परिसरातील अनेक गावांचा सांगली जिल्ह्याशी संपर्क अधिक सोयीस्कर झाला असला, तरी वाढती वाहतूक लक्षात घेता तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे तातडीने रुंदीकरण करून दुहेरी मार्ग विकसित करण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे.
तुंग–सुखवाडी पुलामुळे भिलवडी, संतगाव, सूर्यगाव, अमणापूर, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर आदी गावांतील नागरिकांचा सांगलीपर्यंतचा प्रवास सुमारे पाच ते सात किलोमीटरने कमी झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्याचा अरुंद रस्ता वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे.
समोरासमोर मोठी वाहने आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करून दुहेरी मार्ग तयार केल्यास प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्ता रुंद झाल्यास शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी वेळेत सांगलीच्या बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवांना वेगाने पोहोचता येईल, त्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.
माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात विकास निधी उपलब्ध करून कृष्णा नदीवरील तुंग–सुखवाडी पुलाची उभारणी केली होती. या पुलामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. आता या पुलाशी जोडलेल्या तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे रुंदीकरण करून दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येत आहे.
