
पुणे प्रतिनिधी
शिरूर शहरातील सोनार आळी परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिरूर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विशेष रेस्क्यू मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बांधकाम सभापती सुनिल शंकर जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत झाले आहे. सकाळपासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी फिरून मोकाट कुत्र्यांचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्याची मोहीम सुरू केली.
सोनार आळीतील घटनेनंतर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली.
याबाबत बांधकाम सभापती सुनिल शंकर जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. शहरातील ज्या भागांत हा त्रास अधिक आहे, त्या सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्याने रेस्क्यू मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.”
नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर नगरपरिषद नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करत असून, या मोहिमेमुळे विशेषतः सोनार आळीसह विविध भागातील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे. नागरिकांनी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे आणि बांधकाम सभापती सुनिल शंकर जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत ही मोहीम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
