
माढा | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आढेगाव, टाकळी, गार अकोले आणि कोंढार परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळीची पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजाची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. संबंधित महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले असले तरी अनेक शेतकरी अद्यापही शासकीय अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार आहे.
नुकसानभरपाई तातडीने मिळावी, पंचनाम्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पीकविमा व शासकीय योजनांचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
अवकाळी पावसामुळे केळीसह इतर पिकांनाही फटका बसल्याने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
